आनंदपीठ'ला फॉलो करा :

कॅम्प

आनंदपीठ पालक कॅम्प, जून २०२६

पालक कॅम्पचे उद्घाटन, पर्यावरण उद्योजकांच्या हस्ते संपन्न

पालकांच्या कॅम्पचे उद्घाटन पर्यावरण उद्योजक सागर अहिवळे आणि आरती अहिवळे यांच्याहस्ते संपन्न झाले. देशात आणि जगभरात पर्यावरणाचा मुद्दा केंद्रस्थानी आला असताना सागर आणि आरती अहिवळे यांचे कार्य अधिक ठळक होते. खरं तर त्यांनी भविष्यात वाढत जाणाऱ्या पर्यावरण प्रश्नाचे गांभीर्य ओळखून अनेक वर्षांपूर्वीच यासंदर्भात कृतीशील पावले टाकायला सुरुवात केली होती. आज त्यांच्या कामाने उद्योगांमुळे पर्यावरणाची होणारी हानी टळण्यास मदत होत आहे. अनेक उद्योगांना पर्यावरण, सामाजिक जबाबदारी आणि प्रशासन (ईएसजी) मानकांशी जोडण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. आरती यांनी भारत-नॉर्वे हरित सामरिक भागीदारी परिषदेत भारताच्या उद्योग प्रतिनिधी मंडळात उद्योजिका म्हणून नेतृत्व केलेले आहे.

टीनएजर्सशी संवाद साधण्याचा प्रभावी मार्ग. कलेच्या माध्यमातून संवाद. नाटककार अतुल पेठे यांचे सत्र

टीनएजर्सशी संवाद कसा साधायचा, असा मोठा प्रश्न पालकांना पडलेला असतो. पण यावर प्रभावी व सर्जनशील उपाय सांगितला तो नाटककार अतुल पेठे यांनी. कलेच्या माध्यमातून टीनएजर्सशी सुसंवाद साधला जावू शकतो, याबद्दल नाटककार अतुल पेठे यांनी पालकांच्या कॅम्पमध्ये पालकांशी संवाद साधताना सांगितले.

ग्लोबल शिक्षण व करिअर

डब्लिन (आयर्लंड) येथील ट्रिनिटी कॉलेजमध्ये ‘भारतातील ऊसतोड कामगार स्त्रियांचे मानसिक आरोग्य’ या विषयात पीएच.डी. करणारी आणि शिकवणारी पुण्याची सायली सहस्रबुद्धे. लातूरहून शिक्षणासाठी पुण्यात आलेला आणि सध्या युनिव्हर्सिटी ऑफ लंडनच्या स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज विभागात संशोधन करणारा आणि तिथे शिकवणारा अभिषेक भोसले. हे दाम्पत्य आनंदपीठावर आलं. आणि मुलांच्या शिक्षणाची व करिअरची चर्चा वैश्विक पातळीवर गेली. अभिषेक यांनी ग्लोबल करिअर, शिक्षणाला असलेला वैश्विक आयाम यावर भाष्य केले. सायली यांनी पालकांचं मानसशास्त्र यावर पालकांशी संवाद साधला.

मेडीटेशन : सुदृढ आरोग्यासाठी अनिवार्य - सोनी जाधव, कॅम्प डायरेक्टर, योग प्रशिक्षक

मुलांची काळजी घेत असताना पलकांचेही आरोग्य महत्त्वाचे आहे. कॅम्पच्या डायरेक्टर व योग प्रशिक्षक सोनी जाधव यांनी पालकांकडून मेडिटेशनचे विविध प्रकार करवून घेतले.

पालकांनी नेमकं काय करायचं? - डॉ. राजीव तांबे, शिक्षणतज्ज्ञ व सर्जनशील बालसाहित्यकार

बदलत्या काळात मुलांसोबत वाढताना किंवा त्यांना घडवताना पालकांनी नेमकं काय करायचं?, हा मोठा प्रश्न पालकांसमोर असतो. त्यावरच डॉ. राजीव तांबे सरांनी आनंदपीठाच्या पालक कॅम्पमध्ये मार्गदर्शन केलं.

राजीव तांबे सर सर्जनशील बालसाहित्यकार म्हणून महाराष्ट्राला माहिती आहेतच. विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी, पालकांसाठी त्यांनी देश विदेशात अनेक कार्यशाळा घेतल्या आहेत. अभिनव शिक्षणपद्धतींवर त्यांचा विशेष भर आहे.

बाल साहित्यातील विशेष योगदानाबद्दल त्यांना 2016 मध्ये मानाच्या ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ ने सन्मानित करण्यात आले आहे.

सरांनी मुलांसाठी कथा, कविता, कादंबरी, एकपात्रिका, द्विपात्रिका, एकांकिका, नाटक, संवादकथा, बोलक्या गोष्टी, विज्ञानकथा, विज्ञान प्रयोगकथा, विज्ञान भयकथा, फॅंटसीकथा, रुपककथा, प्राणीकथा, साहसकथा, रहस्यकथा, भाषेचे खेळ, गणिताचे खेळ, शून्य खर्चाचे विज्ञानाचे प्रयोग, शिक्षणविषयक लेखन अशा विविध 29 साहित्य प्रकारात लेखन केले आहे.

‘युनिसेफ’ सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेत त्यांनी शिक्षण सल्लागार म्हणून काम केले आहे.

स्क्रीनबाहेरचे निसर्ग सौंदर्य- पर्यावरण तज्ज्ञ अनिकेत मोताळेंचे सत्र

सतत स्क्रीनमध्ये डोकावता डोकावता खरे निसर्ग सौंदर्य पाहण्याचं आपण विसरुन गेलो आहोत. पर्यावरण अभ्यासक अनिकेत मोताळे यांनी घेतलेल्या सत्रात पालकांना निसर्ग अनुभवाची एक वेगळी दृष्टी दिली. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या आनंदपीठात हा निसर्ग आनंद द्विगुणित झाला. सर्व पालकांसोबत नेचर वॉक करत त्यांनी आजुबाजूची झाडे, पक्षी, कीटक, डोंगर, दऱ्या, झरे यांची शास्त्रीय माहिती दिली.

‘किशोर’चे संपादक किरण केंद्रे बोलताना.

केंद्रे हे किशोरवयीन मुलांसाठीच्या ‘किशोर’ या मासिकांचे संपादक आहेत. गेली अनेक वर्ष ते हे मासिक यशस्वीरित्या चालवतात. फार पूर्वीपासूनच त्यांनी किशोरवयीन मुलांचे विषय हाताळलेले आहेत. पालकांना त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी आनंदपीठाने उपलब्ध करुन दिली.

मे २०२६ आनंदपीठ समर कॅम्प

आनंदपीठ समर कॅम्प- २०२६

तेरा ते एकोणीस वर्षे या वयोगटातील दोस्त या कॅम्पची आतुरतेने वाट बघत असतात. आनंदपीठावरचा हा दहावा कॅम्प, यामध्ये १३ ते १९ या वयोगटातील तब्बल ७६ मुलं-मुली एकूण २३ जिल्ह्यातून आलेली होती. हा कॅम्प ३ ते ८ मे रोजी आनंदपीठावर घेण्यात आला.

या कॅम्पसाठी नागराज मंजुळे, गिरिजा ओक, शाहू पाटोळे, राजू बाविस्कर, बाबा नदाफ, रविकांत तुपकर, वेदांती भागवत, भूषण कोरगावकर, उद्योजक भरत गीते, अतिरिक्त जिल्हाधिकारी सतीश राऊत, संजय आवटे, विदुर महाजन, निमिष साने, डॉ. रेखा शेळके, हर्षल पाटील, शिव कदम, अनिकेत मोताळे, सोनाली शिंदे, सचिन दिवाण, नंदिनी जाधव, सचिन निंबाळकर, राहुल कदम, प्रियदर्शिनी मोरे, दिक्षांती गायकवाड, रिचा देवकर, डॉ. उज्ज्वला बर्वे, प्रभाकर भोसले, डॉ. नीरज जाधव, गणेश माने- देशमुख, अक्षय शिंपी, सचिन पांडुळे, डॉ. राजीव शिंदे, माधुरी आवटे अशा अनेक दिग्गजांनी मुलांशी गप्पा केल्या.

उमेश खाडे आणि सोनाली शिंदे या कॅम्पचे डायरेक्टर होते.

या कॅम्पसाठी एकूण २८३ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी, ७६ मुला-मुलींची निवड आपण मुलाखतीतून निश्चित केली होती. भन्नाट प्रतिसाद या कॅम्पला मिळाला.

'तेंडल्या' चित्रपटाच्या टीमसोबत हा चित्रपट पाहाणे हा अनुभव फारच भारी होता.

'अविस्मरणीय असा हा कॅम्प ठरला.

आनंदपीठ समर कॅम्प 2026

समता आणि प्रेमातून उगवलेले आनंदी जग साकारण्यासाठीची पेरणी

आनंदपीठ कॅम्प@भालगुडी DAYS!

‘टीन एज’ वादळी असतं हे खरंच, पण हेच वय घडवतं, बिघडवतं… म्हणून, हा कॅम्प.

१३ ते १९ वर्षे या वयोगटातील मुला-मुलींसाठी

रील्सच्या दुनियेतून बाहेर पडून रिअल जग पाहायचंय? व्हाट्सॲप विद्यापीठातून बाहेर पडायचंय? स्वतंत्र विचार करण्याची क्षमता हवीय? करीअरच्या भन्नाट वाटा दिसायला हव्यात? जात-पात-धर्म-लिंग या पल्याड ‘माणूस’ व्हायचंय? मुख्य म्हणजे, आनंदानं आयुष्य जगायचंय?

मग, आनंदपीठ कॅम्प तुमच्यासाठीच.

अनेक नामवंत इथं येतील. मुलांसोबत बागडतील. नव्या वाटा दाखवत जगणं समृद्ध करतील. कुठे असेल ही छावणी?

पुण्यापासून तासाभराच्या अंतरावर. सह्याद्रीच्या कुशीत, निसर्गरम्य डोंगरावर. शेजारी तिकोना, तुंग, लोहगड… इकडेच पवना डॅम, समोर हाडशी लेक.

कधी? ३ मे ते ८मे २०२६

आजच नोंदणी करा. गुगल फॉर्म भरून पाठवा.

मग मुलाखती होतील. पन्नास जणांनाच संधी.



आनंदपीठ आयोजित सहावा युथ-कॅम्प

आनंदपीठ आयोजित सहावा युथ-कॅम्प आनंदपीठाच्या निसर्गरम्य परिसरात १२ ते १५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत यशस्वीरित्या पार पडला. या कॅम्पमध्ये नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, यवतमाळ, पुणे, सातारा, सोलापूर, हिंगोली आणि अहिल्यानगर या दहा जिल्ह्यांतील एकूण ५२ विद्यार्थी सहभागी झाले. अतिशय उत्साहपूर्ण आणि धुमधडाक्यात हा कॅम्प पार पडला.

विविध क्षेत्रांतील दिग्गज व्यक्तींनी मार्गदर्शनपर सत्रे घेत विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. नेचर वॉकदरम्यान विद्यार्थ्यांनी तिकोना किल्लाही सर केला. जळगावच्या विद्यार्थ्यांनी अहिराणी गाण्यावर पारंपरिक नृत्य सादर करत सांस्कृतिक कार्यक्रम रंगतदार केला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आनंदपीठाने व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांना सातत्यपूर्ण प्रोत्साहन दिले.

-आनंदपीठ